केंद्र, योगी सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया
उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीला झालेल्या अपघातानंतर या घटनेचे संसदेत तसेच संसदेच्या बाहेर तीव्र पडसाद सोमवारी उमटले. भाजपप्रणीत केंद्र सरकार तसेच, उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर जोरदार टीका होऊ लागली आहे. राज्यसभेत विरोधी पक्षांनी केलेल्या निदर्शनानंतर सभागृह तहकूब करावे लागले. दिल्लीत ‘इंडिया गेट’वर पीडिताला पाठिंबा देण्यासाठी बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि उत्तर प्रदेशमधील भाजप आमदार कुलदीप सेंगर याच्याविरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला होता.
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे केंद्र सरकारवर टीका केली. केंद्र सरकार म्हणते, बेटी बचावो, बेटी पढाओ. पण, भाजपच्या आमदराने बलात्कार केला तर प्रश्न विचारायचे नाहीत. भारतीय महिलांसाठी विशेष शैक्षणिक वर्ग घेतला जात आहे, अशा उपरोधात्मक शब्दांत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी असलेल्या महासचिव प्रियंका गांधी-वड्रा यांनीही उत्तर प्रदेश सरकारवर शाब्दिक प्रहार केला. पीडित मुलगी याच अपघातात जबर जखमी झाली असून रुग्णालयात चिंताजनक अवस्थेत आहे. पीडिताच्या वडिलांचा पोलीस कोठडीत मारहाणीमुळे मृत्यू झाला. पीडित तसेच कुटुंबीयाना धमक्या दिल्या गेल्या. पीडिताची साक्षीदार काकीही आता अपघातात दगावली आहे. आरोपीची अजूनही भाजपची आमदारकी कायम राहते.
उत्तर प्रदेश सरकारची ‘भयमुक्त उत्तर प्रदेश’ मोहीम चालवण्याची हिंमत तरी कशी होते? नागरिकांचे हित साधण्याची नैतिक जबाबदारी या सरकारची आहे की नाही? की, ती कधीच नव्हती?, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रियंका गांधी यांनी व्यक्त केली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये रायबरेली येथे उन्नाव बलात्कारातील पीडित तरुणी बसलेल्या कारला ट्रकने धडक दिली. त्यात तिचे दोन नातेवाईक ठार झाले असून या तरुणीची तसेच, वकिलाची प्रकृती चिंताजनक असून दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात म्हणजे घातपात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. अपघातातील ट्रकची नंबरप्लेट काळी करण्यात आली होती. त्यावरूनच आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेसनेते मनीष तिवारी यांनी पत्रकार परिषदेत केली.