केंद्रातील पुढील सरकारच्या स्थापनेत टीडीपीची भूमिका महत्वाची असेल
विजयवाडा – प्रादेशिक पक्ष एकत्र येऊन केंद्रात पुढील सरकार स्थापन करतील. त्यामध्ये तेलगू देसम पक्षाची (टीडीपी) भूमिका महत्वाची असेल, असे भाकित त्या पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू यांनी केले आहे.
टीडीपीच्या वार्षिक परिषदेची मंगळवारी रात्री येथे सांगता झाली. त्यानंतर चंद्राबाबू पत्रकारांशी बोलत होते. आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देण्यास नकार मिळाल्याने नाराज झालेला टीडीपी काही महिन्यांपूर्वी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमधून बाहेर पडला. त्यानंतर चंद्राबाबूंनी भाजप आणि केंद्र सरकारवरील टीकेची धार वाढवली आहे. आंध्रच्या मागास जिल्ह्यांना विशेष पॅकेज देण्याचे आश्वासन भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने दिले होते.
मात्र, भाजपने आंध्रच्या जनतेची फसवणूक केली, असे ते म्हणाले. केंद्र सरकारने दिलेल्या निधीच्या वापराबाबत आंध्र सरकारने खोटी प्रमाणपत्रे दिली, असा आरोप नुकताच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षक्ष अमित शहा यांनी केला. त्यावरून पलटवार करताना चंद्राबाबू म्हणाले, शहा हे केवळ पक्षाचे अध्यक्ष आहेत. कुठल्या अधिकाराने ते आम्हाला सवाल करत आहेत?
दरम्यान, पुढील वर्षी नव्या केंद्र सरकारच्या स्थापनेत टीडीपी महत्वाची भूमिका निभावेल. मात्र, मला पंतप्रधानपदाची आकांक्षा नाही. याआधी दोनवेळा मला ते पद भुषवण्याचा प्रस्ताव आला होता. मला केवळ आंध्रच्या विकासात रस आहे, असे चंद्राबाबूंनी इतर मुद्द्यांवर बोलताना म्हटले. केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी प्रादेशिक पक्ष कॉंग्रेसची मदत घेणार का, या पत्रकारांच्या प्रश्नावर थेट उत्तर देण्याचे चंद्राबाबूंनी टाळले. त्या सर्व बाबी वेळेचा विषय आहेत. आता मला कुठला संभ्रम निर्माण करायचा नाही, असे त्रोटक उत्तर त्यांनी दिले.