कृषी कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी पंजाबच्या उप महानिरीक्षकांचा राजीनामा
चंदीगढ – कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी पंजाब, हरयाणासह देशातील विविध राज्यातील शेतकरी दिल्लीच्या वेशीवर गेल्या १८ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. तसेच, केंद्र सरकारसोबत त्यांच्या चर्चाही सुरू आहेत. मात्र, साऱ्या बैठका अपयशी ठरल्याने शेतकरी आता तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. त्यातच, कृषी कायद्यास विरोध दर्शवण्यासाठी व शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी पंजाबचे उप महानिरीक्षक(तुरूंग) लखमिंदर सिंह जाखड यांनी राजीनामा दिला आहे.
उप महानिरीक्षक जाखड यांनी सांगितले की,“शनिवारी मी राजीनामा दिला आहे. नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणा आणि अन्य भागांमध्ये हजारो शेतकऱ्यांनी दिल्ली सीमेवरील अनेक ठिकाणं बंद केली आहेत. शेतकऱ्यांना भीती आहे की एमएसपी प्रणाली संपुष्टात आणली जाईल. ज्यामुळे त्यांना कॉर्पोरेट्सच्या दयेवर अवलंबून रहावे लागेल.’
ते पुढे म्हणाले की, ‘शेतकरी बऱ्याच दिवसांपासून शांततेच्या मार्गाने विरोध करत आहेत. कोणीच त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या नाही. मी एका शिस्तबद्ध दलातून आहे आणि नियमानुसार, मी कर्तव्यावर असताना विरोधाचे समर्थन करू शकत नाही. मला आपल्या नोकरी बद्दल अगोदर निर्णय घ्यायचा आहे आणि मग पुढील कार्यवाही ठरवायची आहे.
नियमानुसार मला या प्रकारच्या कार्यवाहीसाठी तीन महिन्यांची नोटीस द्यावी लागेल. मात्र जर आज मी राजीनामा देत असेल तर मला त्या काळातील भत्त्यांची रक्कम जमा करावी लागेल. मी रक्कम जमा करण्यास तयार आहे. कारण मला आता जायचं आहे. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मला याबद्दल अभिमान आहे. असं देखील जाखड यांनी म्हटलं आहे.