काश्मीरमधील नजरकैदेतील नेत्यांची लवकरच सुटका- राम माधव
जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द करून विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या राजकीय नेत्यांची लवकरच सुटका केली जाणार असून ते त्यांची राजकीय कामे सुरळीतपणे सुरू करू शकतील, असे भाजपचे नेते राम माधव यांनी म्हटले आहे.
केंद्राने ५ ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करून त्याचे दोन केंद्रशासित राज्यात विभाजन केले होते. त्याबाबत आयोजित जनजागरण सभेत माधव यांनी सांगितले, की ‘राज्यपाल राजवट उठवल्यानंतर विधिमंडळ सूत्रे हाती घेईल. त्यानंतर अनुसूचित जाती आयोग, महिला आयोग, अल्पसंख्याक आयोग यांची स्थापना करण्यात येईल. कलम ३७० हा सत्तर वर्षांपासूनचा कर्करोग होता, पंतप्रधान मोदी यांनी तो दूर केला आहे. गेली अनेक वर्षे कायदा व सुव्यवस्था सुरळीत नसलेला हा भाग आता शांत असून दोनशे नेते नजर कैदेत आहेत. हजारो लोकांना अटक केल्याचा प्रचार खरा नाही. कायदा व सुव्यवस्थेसाठी दोनशे लोकांना स्थानबद्ध करणे किंवा नजरकैदेत ठेवणे यात गैर काही नाही. त्यात मानवी हक्कांचे उल्लंघन होत नाही. टीव्ही, पुस्तके, इतर सर्व सुविधा असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये या नेत्यांची सोय करण्यात आली असून ती तात्पुरती व्यवस्था आहे. दोनशे लोक स्थानबद्ध असल्याने काश्मीरमध्ये शांतता आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांना स्थानबद्ध करणे किती महत्त्वाचे होते हे यातून लक्षात येते. त्यांना कायम कैदेत ठेवण्यात येणार नाही तर सोडून देण्यात येईल. लडाखचे लोक आता आनंदात असून जम्मूलाही देशात एकात्म होण्याचा आनंद आहे. काश्मीर खोऱ्यात काही प्रश्न आहेत, पण ते संवेदनशीलतेने हाताळले जातील. काश्मीरमध्ये मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा आरोप केला जात असला तरी आंतरराष्ट्रीय समुदायाने येथे येऊन परिस्थिती पाहिलेली नाही. गेल्या अनेक दशकात जम्मू काश्मीरमध्ये खासगी गुंतवणूक आली नाही कारण कलम ३७० त्यात आड येत होते. पाकिस्तान हे दहशतवादाचे मुख्य केंद्र असून भारत व अमेरिका यांच्यातील व्यापाराचे प्रमाण मोठे असल्याने पाकिस्तानपेक्षा भारत अमेरिकेला जवळचा मित्र वाटतो.’