कारशेड आरे कॉलनीतून दुसरीकडे नेण्याचा निर्णय पुर्णपणे चुकीचा – देवेंद्र फडणवीस
मुंबई – आरे कॉलनीतील जागा ही जंगलासाठी देण्यात येणार आहे. तिथे मेट्रो कारशेड होणार नाही. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले आहे. आरेच्या बाबतीत सध्या मी अभ्यास केला नाही. मात्र, जरी ती जागा वनविभागाला दिली तर त्यात खुप अडचणी आहेत. याचं कारण असं आहे की, आपण एखादं वन जेव्हा तयार करतो तेव्हा काही अडचणींना सामोरे जावे लागते. आरे कॉलनीमध्ये कारशेड तयार करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने संमत्ती दिली. मात्र, आता ते काम हटवण्याचे सरकारने सांगितले आहे ते योग्य नाही, असे फडणवीस म्हणाले. आज नागपूरमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी कारशेड बाबत मत व्यक्त केले.
सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बदल्यांवरही त्यांनी भाष्य केले. बदल्यांच्या संदर्भात योग्य वेळ आल्यावर मी बोलणार आहेच. डीजींकडे असणारी माहिती लोकांपर्यंत पोहोचली तर सरकारची निश्चित अडचण होईल, असा स्पष्ट इशारा फडणवीसांनी आघाडी सरकारला दिला आहे. दरम्यान, आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी फडणवीस आणि त्यांच्या सरकारला बदल्यांवरुन टोला लगावला होता.