काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत राहुल गांधी; जाणून घ्या कोणाचा विरोध, कोणाचं आहे समर्थन?
नवी दिल्ली । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. या शर्यतीत आता राहुल गांधी यांचंही नाव घेतलं जात आहे. काँग्रेसकडून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू आहे. त्यातच, पक्षाला उभारी येण्याकरता राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अध्यक्ष पदासाठी राहुल गांधी यांचं नाव चर्चेत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुका हरल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे हंगामी अध्यक्षपद स्वीकारले. तेव्हापासून सोनिया गांधीच अध्यक्ष आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी नामांकन प्रक्रिया २४ ते ३० सप्टेंबर दरम्यान राबवण्यात येणार आहे.
काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण? काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी घराण्यातील व्यक्ती पुढे येणार की बिगर गांधी अध्यक्ष होणार याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची नियुक्ती व्हावी अशी काही नेत्यांची मागणी आहे, तर काही नेत्यांनी ही मागणी फेटाळली आहे. बिगर गांधी कुटुंबातील अध्यक्ष म्हणून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं नाव चर्चेत होतं. मात्र, अशोक गेहलोत यांनीच काल अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांच्या नावाची शिफारस करणारा प्रस्ताव मांडला आहे.
राहुल गांधी यांना कोणाचं समर्थन?
राहुल गांधी अध्यक्ष व्हावेत अशी मागणी अशोक गेहलोत यांनी केली आहे. तर, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची कमान राहुल गांधी यांच्या खांद्यावर असावी असं मत व्यक्त केलं आहे. मल्लिकार्जून खर्गे, अजय माकन, पीसीसी चीफ गोविंद सिंह डोटासरा यांच्यासह अनेक नेत्यांनीही राहुल गांधी यांचं समर्थन केलं आहे. जयराम रमेश यांनीही राहुल गांधी यांचं समर्थन केलं आहे. भाजपाच्या विरोधात निडरपणे आवाज उठवण्यात राहुल गांधी यशस्वी ठरले असल्याने त्यांनी अध्यक्षपद स्विकारालं असं रणदीप सिंह सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांच्या विरोधात कोण?
काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी जर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेलहोत उभे राहिले तर, खासदार शशि थरूरसुद्धा या रिंगणात येऊ शकतील. पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लोकशाही पद्धतीने झाल्यास पक्षाला नवसंजीवनी येईल, असं शशि थरुर यांच्या समर्थकांनी म्हटलं आहे. अध्यक्षपदासाठी अधिक लोकांनी निवडणूक लढवली तर पक्षासाठी ते चांगलं राहिल. अध्यक्षपदाची निवडणूक निपक्ष व्हावी अशीही मागणी शशि थरुर यांच्यासह अनेक नेत्यांनी केली आहे. शशि थरूर यांच्यासह मनीष तिवारी, आनंद शर्मा आणि भूपेंद्र हुड्डा यांच्यासारख्या जी-२३ मधील नेत्यांनी अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवण्याची आशा बाळागली आहे.