काँग्रेसने यापुढे समान पातळीवर चर्चा : प्रकाश आंबेडकर
मुंबई – लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाआघाडी आणि वंचित बहुजन आघाडीने एकमत न झाल्यामुळे दोघांनाही फटका बसला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर विधानसभा निवडणुकीच्या तयारी पुढच्या आठवड्यात बैठक घेणार आहेत. विधानसभेत काँग्रेसला चर्चा करायची असल्यास ती समसमान पातळीवर येऊनच करावी लागेल. कारण काँग्रेससोबत राजकीय गुलामीची व्यवस्था संपली आहे. असे आंबेडकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून पोस्टव्दारे सांगितले आहे.
लोकसभा निवडणुकीत आंबेडकर यांनी एमआयएमला सोबत घेऊन वंचितचे ४८ उमेदवार उभे केले होते. निवडणुकीत अनेक मतदारसंघात वंचितच्या उमेदवाराने लाखांच्यावर मते घेतली. त्यामुळे, काँग्रेस महाआघाडीच्या नऊ उमेदवारांना त्याचा फटका बसला. आता, विधानसभेत कॉंग्रेसला वंचित बहुजन आघाडी सोबत चर्चा करायची असेल तर ती समसमान पातळीवर येऊनच करावी लागेल असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.
काँग्रेसला या पुढे वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करायची असेल, तर ती समसमान पातळीवर येऊनच करावी लागेल. कारण कॉंग्रेससोबत राजकीय गुलामीची व्यवस्था संपली आहे.
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) May 26, 2019
औरंगाबादमधून इम्तियाज जलील हे एकमेव उमेदवार निवडून आले आहे. वंचित बहुजन आघाडीमुळेच राज्यात कॉंग्रेसला अपयश आले असल्याचे काँग्रेसने मान्य केले आहे. त्यामुळे येणा-या विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडी आणि कॉंग्रेस महाआघाडी एकत्र येतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.