कर्जमाफी : दिल्लीत शेतकऱ्यांचं मूत्रप्राशन आंदोलन
नवी दिल्ली: कर्जमाफी आणि आर्थिक मदतीच्या मागणीसाठी गेल्या एक महिन्यापासून दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या तामिळनाडूतील शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध तुटत चालला आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या मार्गांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज मूत्रप्राशन करून मोदी सरकारचा निषेध केला. सरकारनं आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यास मानवी मैला खाण्याची धमकीही त्यांनी दिली आहे.
दुष्काळामुळं उभी पिकं करपून गेलेल्या तामिळनाडूतील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारकडं मदतीची मागणी केली आहे. सरकारनं दुष्काळग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करावं, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यासाठी ते जंतरमंतर येथे आंदोलनाला बसले आहेत. कधी विवस्त्र होऊन, कधी रस्त्यावर सांबार-भात खाऊन तर कधी साप, उंदीर खाऊन या शेतकऱ्यांनी आतापर्यंत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळं हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आत्मक्लेषाचा धक्कादायक मार्ग पत्करला आहे. आंदोलक शेतकरी आज प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये चक्क मूत्र घेऊन समोर आले. त्यामुळं एकच खळबळ उडाली.