कर्जतमध्ये एक हजार एकरवर फिल्म स्टुडिओ उभारणार – पार्थ पवार
कर्जत, (महा-ई-न्यूज ) – कर्जत परिसरात एक हजार एकरावर हाॅलिवूड फिल्म इंडस्ट्रीजचा स्टुडिओ उभारणार आहे. त्या स्टुडिओचे सर्व्हेक्षण कामही पुर्ण करण्यात आलेले आहे. हा स्टुडिओ उभारल्यानंतर परिसरातील हजारो तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध होणार आहे. शिवाय स्टुडिओमुळे छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायाला चालना देखील मिळेल, त्यामुळे या निवडणूकीत तुम्ही मला साथ देवून लोकसभेत पाठवा, खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा हे काम मार्गी लावेन, असा विश्वास महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी व्यक्त केला.
मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी, काॅंग्रेस, शेकाप मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांचा आज कर्जत तालुक्यात प्रचार दाैरा सुरु असून उमरोली येथील सर्वेष मंगल कार्यालयातील झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी सुरेश लाड, प्रमोद हिंदुराव, सागर शेळके, प्रविण पाटील, मारुती विखे, विकास बडेकर, विष्णू कालेकर, अनंत भगत, सुर्याजी पाटील, काशिनाथ पाटील, राजेंद्र विरले, एकनाथ धुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
पार्थ पवार म्हणाले की, पनवेल-कर्जत रेल्वेचा प्रश्न पंधरा वर्षापासून प्रलंबित आहे. मागील कित्येक वर्षापासून शिवसेना खासदारांनी हा प्रश्न सोडविलेला नाही. रेल्वे प्रश्नाकडे त्यांनी दुर्लक्ष केले. लष्कराच्या हद्दीतील पिंपरी-चिंचवड,मावळात रेडझोनचा, रस्त्यांचा प्रश्न सोडविला नाही. या निवडणूकीत तुम्ही माझ्या पाठिंशी उभे रहा, मला साथ देवून लोकसभेत पाठवा, मी खासदार झाल्यानंतर केंद्रातून हे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा माझा प्रयत्न राहिल. मागील साडेचार वर्षात सिंचन प्रकल्पावरुन पक्षाला बदनाम करण्याचा काम भाजप-शिवसेनेने केले. परंतू, सिंचन प्रकल्पात न्यायालयाने क्लीनचिट दिली आहे. राज्यातील सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सर्वांधिक कामे आघाडी सरकारने केली आहेत. गेल्या साडेचार वर्षात युती सरकारने एकही सिंचन प्रकल्प मार्गी लावलेला नाही. तसेच पंतप्रधान मोदींनी युवकांची दिशाभूल करत दोन कोटी रोजगार दिला नाहीच, तर पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात देतो, म्हणणा-या सरकारने लोकांना खोटी आश्वासने देत भूलथापा दिल्या. यावेळेला मोदी सरकार कायमचे घरी पाठवा, असेही आवाहन यावेळी त्यांनी केले.