कधीही पक्षांतर न करता ते अकरा वेळा आमदार झाले
गावात एकच बस थांबते. त्यामुळे दुसऱ्या बसलाही थांबा देण्यात यावा, म्हणून पेन्नूरमधल्या प्रेरणा गवळी या शाळकरी मुलीने थेट आमदारालाच पत्र लिहिले. पहिल्या पत्राला उत्तर आलं नाही म्हणून प्रेरणा दुसरं पत्र लिहिलं. यावेळी तिच्या पत्राची लागलीच दखल घेतली गेली. आमदारांनी पंढरपूरच्या आगारप्रमुखांना फोन केला आणि सोलापूर-पंढरपूर बसला पेन्नूरला बस थांबा सुरू करण्याची सूचना केली. हे एवढ्यावरच थांबलं नाहीतर त्या आमदारांनी प्रेरणाला पत्र लिहिले. ज्यात नागपूरच्या अधिवेशनात असल्याने पहिल्या पत्राला उत्तर देऊ शकलो नाही, असं स्पष्टीकरणही दिलं. साधेपणा आणि मातीशी नाळ राखण्याच्या स्वभावामुळेच लोकांनी त्यांना ११ वेळा आमदार बनवून विधानसभेवर पाठवलं. हे आमदार दुसरे तिसरे कोणी नसून ते आहेत, सांगोल्याचे गणपतराव देशमुख!
गणपतराव देशमुख यांचा जन्म १९२७ सालचा. मोहोळ-पंढरपूर रस्त्यावर असलेलं पेन्नूर हे त्यांचं गाव. मॅट्रिकचे शिक्षण पुण्यात घेतल्यानंतर गणपतराव देशमुख यांनी पुण्यात पुढील शिक्षण पूर्ण केलं. याच काळात त्यांचा स्वातंत्र्य चळवळीकडे कल वाढला. काँग्रेस विचारसरणीच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आले. त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे शंकरराव मोरे, नाना पाटील यासारख्या कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि ते या विचारधारेकडे झुकले. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मोठे बंधु अप्पासाहेब पवार आणि गणपतराव देशमुख रूममेट होत. तर स्वातंत्र्यानंतर त्यांनी राजकारणात पाऊल टाकत १९६२ची विधानसभा निवडणूक लढवली आणि ते सांगोल्याचे आमदार झाले. त्यांची ही वाटचाल दोन निवडणुका सोडल्या तर सुरूच आहे. आमदार होऊन पहिल्यांदाच विधानसभेत गेलेल्या गणपतरावांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर केलेल्या भाषणाबद्दल यशवंतराव चव्हाण यांनीही त्यांचं कौतूक केलं होतं.