‘कडकनाथ’चे पैसे वसूल करून द्यावेत – माजी खासदार राजू शेट्टी
कोल्हापूर |महाईन्यूज|
कडकनाथ कोंबडी घोटाळा मोठ्या प्रमाणात झाला असून विरोधी पक्षनेते या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी गोरगरीब शेतकर्यांचे पैसे वसूल करून द्यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
भाजप अणि रयत संघटनेने काढलेल्या आत्मनिर्भर यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमानिमित्ताने शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला. इस्लामपूर शहरामध्ये अतिरेकी शिरले की काय? घोटाळे बहाद्दरांसाठी पोलिस बंदोबस्त कशासाठी ? असा सवाल करत राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना टोलाही लगावला आहे.
शेट्टी म्हणाले, कडकनाथ कोंबडी घोटाळ्यात अनेक शेतकर्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली होती. शेतकर्यांना लाखो रुपयांच्या उत्पन्नाचे आमिष दाखवण्यात आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काळात कडकनाथ घोटाळा झाला. याचे उत्तर त्यांनी देऊन गोरगरीब शेतकर्यांना त्यांच्या कष्टाचे पैसे मिळून द्यावेत.