कटकमधील “त्या’ चहावाल्याचे कौतूक
- “मन की बात’मधून पंतप्रधान मोदींची “फिट’ राहण्याचे आवाहन
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज “मन की बात’ या कार्यक्रमातून कटक येथील प्रकाश राव या चहावाल्याचे कौतुक केले. गेल्या 50 वर्षांपासून चहा विकत असलेल्या राव यांनी “आशा-आश्वासन’ नावाची एका शाळा सुरू केली आहे. यामध्ये ते परिसरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या सुमारे 70 मुलांना शिकवतात. राव हे आपल्या उत्पन्नातील 50 टक्के रक्कम ही या शाळेवर खर्च करतात आणि शिकायला येणाऱ्या मुलांच्या शिक्षण, आरोग्य आणि भोजनाची व्यवस्था करतात, अशी माहिती मोदींनी दिली.
मोदी म्हणाले, नुकताच मला डी. प्रकाश राव यांची भेट घेण्याचे भाग्य लाभले. श्रीमान प्रकाश राव हे मागील पाच दशकांपासून शहरात चहा विकतात. एक चहा विकणारा साधारण माणूस.. पण तुम्ही ऐकून हैराण व्हाल.. 70 हून अधिक मुलांना शिकवण्याचे काम ते करत आहेत. राव यांची मेहनत, त्यांची निष्ठा आणि त्या गरीब मुलांच्या जीवनाला नवीन दिशा देण्यासाठी त्यांचे खूप खूप अभिनंदन.
तत्पूर्वी, त्यांनी ज्या युवकांनी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली त्यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर तंदुरूस्त राहण्याप्रती लोकांनी जागरूक राहण्याचा उल्लेख केला. मोदींनी जवाहरलाल नेहरू, वीर सावरकर आणि महात्मा गांधी यांचे स्मरण केले. योग, पर्यावरण दिवस, ईद यावर मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला मोदींनी सर्वांत प्रथम 250 दिवसांहून अधिक काळ नाविका सागर परिक्रमातंर्गत “तारिणी’मधून जगाचा प्रवास करू आलेल्या सहा युवतींचे अभिनंदन केले. त्याचबरोबर “मिशन शौर्य’ अंतर्गत एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या महाराष्ट्रातील आदिवासी युवकांचेही अभिनंदन केले. यांच्यामुळेच समाजाला प्रेरणा मिळते, अशी माहिती त्यांनी दिली.
नेहरूंचा उल्लेख करताना ते म्हणाले, आज 27 मे आहे. भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंची पुण्यतिथी आहे. पंडितजींना मी प्रणाम करतो. त्यानंतर त्यांनी सावरकर आणि महात्मा गांधींचे स्मरण केले.