औरंगाबादेत साखर सहसंचालकांविरोधात दारूची बाटली, मटण देऊन अनोखं आंदोलन
औरंगाबाद – मराठवाड्यातील साखर कारखाने शेतकऱ्यांच्या उसाला 1600 ते 2000 रुपये टन दर देतात. कारखानदार व साखर सहसंचालक कार्यालय यांच्यातील अभद्र युतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, असा आरोप करत शेतकरी संघर्ष समितीने शुक्रवारी सहसंचालक कार्यालयासमोर अनोखे आंदोलन केले.
यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दारूची बाटली, मटण, अंडी व चिल्लर देण्यात आली. गंगाभीषण थावरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आंदोलनात माजलगाव तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते.
कारखाने गेटकेनचा ऊस आणतात अशा शेतकऱ्यांना फक्त एक बिल दिले जाते. बिलाच्या उर्वरित पैशांचा भ्रष्ट्राचार केला जातो, असा आरोप थावरे यांनी केला. 265 जातीच्या उसाला शासनाचे पारितोषिक मिळाले आहे. पण वजन जास्त भरते म्हणून हा ऊस घेतला जात नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केला. कोल्हापुरच्या उसातून साखर निघते मग मराठवाड्याच्या उसातून मीठ तयार होते काय असा सवालही यावेळी करण्यात आला.