औकातीत राहा; नीलेश राणेंचा शिवसैनिकांना इशारा
राणे कुटुंबीय आणि शिवसेना यांच्यातील वाक् युद्ध संपण्याची चिन्हे नसून आता नीलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसैनिकांना इशारा दिला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर गंभीर आरोप केल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी नीलेश राणे यांचे पुतळे जाळले होते. या पार्श्वभूमीवर नीलेश राणे यांनी शिवसैनिकांना ‘औकातीत राहा’, असा इशाराच दिला आहे.
नारायण राणे यांचे पुत्र आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नीलेश राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी काही ठिकाणी नीलेश राणे यांचे पुतळे जाळल्याचे वृत्त होते. या पार्श्वभूमीवर नीलेश राणे यांनी शिवसैनिकांवर बोचरी टीका केली. ट्विटमध्ये नीलेश राणे म्हणतात, मान सन्मान द्याल तर मान सन्मान मिळेल. गल्लीतल्या कुत्र्यांसारखं काही शिवसैनिकानी माझे दोन तीन ठिकाणी पुतळे जाळले. हिंमत असेल तर समोर या आणि परत जाऊन दाखवा. परत सांगतो अवकातीत रहा ठाकरेंची अब्रू वाचवा.
‘नारायण राणे आणि आम्ही आजपर्यंत शिवसेनेविरोधात बोलताना एक मर्यादा पाळली. बाळासाहेब ठाकरेंवर आम्ही कधीही आरोप केले नाहीत. आमच्या राणेसाहेबांचं आजही बाळासाहेबांवर प्रेम होतं मात्र ते ते व्यक्त करु शकले नाहीत. मी राणे साहेब म्हणत असलो तरी ते आधी माझे वडिल आहेत. त्यांचा जर जाहीर कार्यक्रमात कोणी अपमान करीत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही’, असे नीलेश राणे यांनी म्हटले होते. आनंद दिघेंच्या हत्येचा कट रचल्याचे आणि त्यांचा मृत्यू रुग्णालयात झाल्याचे भासवण्यात आले. हे दोन शिवसैनिकांना सहन झाले नाही, त्यामुळे त्यांचा आवाज दाबण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी कोणाला आदेश दिले. ही केस कशी दाबली गेली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. या आरोपानंतर शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती.