ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरोधात भारत डे/नाईट कसोटी खेळण्यास तयार
नवी दिल्ली | बीसीसीआयची धुरा हाती घेतल्यानंतर भारतात गुलाबी चेंडूवर कसोटीची सुरुवात करणारे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी टीम इंडिया आता विदेशातही दिवस/रात्र कसोटी खेळण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
टीम इंडिया आता ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरोधातही दिवस/रात्र कसोटी खेळण्यास तयार आहे, असे गांगुली यांनी माध्यमांना सांगितले. यापूर्वी मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये टीम इंडियाने आपली पहिली दिवस/रात्र कसोटी बांगलादेशविरोधात खेळली होती.
गांगुली यांनी बांगलादेशविरोधातील कसोटी मालिकेतील अखेरचा सामना (कोलकाता कसोटी) दिवस/रात्र खेळवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. गांगुली यांनी यासाठी प्रथम कर्णधार विराट कोहलीला यासाठी राजी केले. त्यानंतर बांगलादेश क्रिकेट मंडळला गुलाबी चेंडूवर कसोटी खेळण्यास तयार केले.
यापूर्वी टीम इंडिया नेहमी गुलाबी चेंडूवर खेळण्यास नकार देतानाच दिसली होती. वर्ष २०१८-१९ मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांना ४ कसोटी सामन्याच्या मालिकेत एक कसोटी गुलाबी चेंडूने खेळण्याचा प्रस्ताव दिला होता. तेव्हा टीम इंडियाने गुलाबी चेंडूचा अनुभव नसल्याचे कारण देत माघार घेतली होती.