ऑटो-रिक्षा आणि कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू
बदनापूर – औरंगाबाद-जालना महामार्गावर ऑटो-रिक्षा आणि कामरध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला. तसेच 4 जण जखमी झाले आहेत.
औरंगाबादहून जालन्याकडे भरधाव वेगात येणाऱ्या टोयोटा कारवर चालकाचा ताबा सुटला आणि कार विरुद्ध दिशेला जाऊन समोरून येणाऱ्या ऑटो रिक्षाला धडकली. यामध्ये रिक्षात बसलेले एकाच कुटुंबातील 5 जण जागीच ठार झाले. मृतक सगळेच जालन्यातील रहिवासी आहेत. हा अपघात बुधवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास बदनापूरपासून 8 किमी अंतरावर घडला.
मृतांमध्ये सहा महिन्यांच्या बालकाचा समावेश आहे. तसेच अपघातातील चार जखमींना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जालना येथील रहिवासी दिनेश रामलाल जाधव (32) रेणुका दिनेश जाधव (25), वंदना गणेश जाधव (27), सोहम गणेश जाधव (9), अतुल दिनेश जाधव (6 महिने) अशी मृतांची नावे आहेत.
ते एमएच 21 बिजी 0107 या क्रमांकाच्या ऑटोरिक्षामध्ये औरंगाबादकडे जात होते. त्यातच बदनापूर पासून 8 किमी अंतरावर औरंगाबादहून जालनाकडे जाणाऱ्या टोयोटा कार (एमएच 30 एझेड 7728) या कारची जोरदार धडक बसली. अपघात इतका भीषण होता की ऑटोरिक्षाचा चुराडा झाला. औरंगाबाद जालना महामार्ग रस्त्यावर अमृतसर धब्याजवळ पेट्रोल पंप आहे. या पंपावर जाण्यासाठी दुभाजकामध्ये रस्ता आहे. या रस्त्याजवळ टोयोटा कार भरधाव वेगात आली आणि दुभाजकावरून विरुद्ध दिशेला वळली. त्यावेळी समोरून रिक्षा येत होती. कारचा वेग जास्त असल्याने आणि चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट रिक्षावर जाऊन आदळली. त्यामुळे रिक्षा आणि कारचा चुराडा झाला.