ऐन गणेशोत्सवाच्या काळात फळे आणि भाजीपाल्याचे दर चांगलेच कडाडले
ऐन गणेशोत्सवाच्या काळात फळे आणि भाजीपाल्याचे दर चांगलेच कडाडले आहेत. किराणा, जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, फळे यांची आवकही कमी होत असल्याने आणि सतत पडणाऱ्या पावसाचा परिणाम दरावर पडला आहे. यामुळे भाजीपाला आणि फळांचे दर ऐन गणेशोत्सवात कडाडले आहेत. हातात पैसा नसतानाच अनेक जणांनी गणेशोत्सव साधेपणात साजरा करण्याकडे कल दिला असला, तरी घरात लागणारे धान्य, भाजीपाला, पूजेला लागणारी फळे, चांगलीच महागली आहेत.
पूजेला लागणारा केवडाही २० ते २५ रुपये नग, पपनस फळ ६० ते ७० रुपये नग या दराने विकला जात आहे. कोथिंबीर जुडी तब्बल ५० रुपयांवर गेली आहे. गोंडाही बाजारात आवक कमी झाल्याने २०० रुपये किलोने विकला जात आहे. गेले काही दिवस सातत्याने पाऊस पडत असल्याने बाजारात भाजी येत नसल्याचे भाजीपाला विक्रेत्याने सांगितले, शिवाय येणारी भाजीही अनेकदा लवकर सततच्या पाण्यामुळे कुजत असल्याने हा फटकाही सहन करावा लागत आहे. महाडमध्ये भाजीपाल्याचे आणि फळांचे दर वाढले असले, तरी ग्रामीण भागातून येणारी भाजी मात्र अजून तरी आवाक्यात असल्याने हा भाजीपाला ग्राहकांना आधार ठरत आहे.
सततचा पावसामुळे भाजीपाला, फळे आणि फुलांची आवक कमी होत असल्याने दर वाढले आहेत. ऐन गणेशोत्सवात दर वाढल्याने ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. लवकरच दर पूर्वपदावर येतील, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केलं आहे.