‘एनडीए’च्या नावावर टिव-टिव करणारे, त्यावेळी गोधडीत रांगतही नव्हते : संजय राऊत
मुंबई | महाईन्यूज
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सत्तास्थापनेच्या तयारीत असलेल्या शिवसेनेला ‘एनडीए’तून बाहेर काढण्यात आल्याची घोषणा भाजपाने रविवारी केली. विशेष म्हणजे शिवसेनेच्या खासदारांची बसण्याची जागाही विरोधी बाकांवर करण्यात आली आहे. भाजपाकडून करण्यात आलेल्या घोषणेला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ‘एनडीए’च्या स्थापनेची हकिकत सांगत खरमरीत उत्तर दिलं आहे. “एनडीएच्या नावावर टिवटिव करणारे, त्यावेळी गोधडीत रांगतही नव्हते,” अशी टीका राऊत यांनी केली आहे.
मुख्यमंत्रीपदावर चर्चा करण्यास नकार दिल्यानंतर शिवसेनेनं राज्यात भाजपापासून दूर जाण्याचा मार्ग निवडला. शिवसेनेच्या या पावलामुळं 105 आमदार असूनही भाजपाला सत्तेपासून वंचित राहावं लागले आहे. तर शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीनं बोलणी सुरू केली. त्यानंतर भाजपानं शिवसेना ‘एनडीए’त नसल्याची घोषणा रविवारी केली. भाजपाकडून करण्यात आलेल्या घोषणेचा खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी खासदार संजय राऊत दिल्लीत दाखल झाले आहे. राऊत म्हणाले, “शिवसेना ‘एनडीए’चा संस्थापक घटक पक्ष आहे. शिवसेेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एनडीएचे संस्थापक होते. जॉर्ज फर्नाडीस निमंत्रक होते. फर्नाडीस हे ‘एनडीए’तील सर्व घटक पक्षांशी संवाद साधायचे. ‘एनडीए’च्या नावानं टिव-टिव करणारे ज्यावेळी एनडीए स्थापन झाली, तेव्हा गोधडीत रांगतही नव्हते,”अशी बोचरी टीका राऊत यांनी केली.