‘एनआरसी’/’सीएबी’ : शहरात शांतता राखण्यासाठी पोलिसांचा ‘रुटमार्च’
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
नागरिकत्व सुधारणा विधेयकाला संसदेत मान्यता देण्यात आल्याने देशभरात विरोधात आंदोलन सुरू आहे. देशातील महत्वाच्या शहरांमध्ये तरुणांकडून जोळपोळ केली जात आहे. सर्वत्र संतप्त वातावरण असून पिंपरी-चिंचवड शहराच्या शांततेसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शुक्रवारी (दि. 20) निगडी ते वाकड असा रुट मार्च काढला. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहरांतर्गत परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
आज सकाळी निगडी परिसरात रूटमार्च काढण्यात आला. ओटास्किम, चिखली या भागातून रूटमार्च काढल्यानंतर वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत काळेवाडी चौकी, तापकीर चौक, नढे नगर या भागातूनही रूटमार्च काढण्यात आला. यामध्ये पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, शैलेश गायकवाड, सतीश माने, पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील, एसआरपीएफ आणि आरसीएफचे 100 कर्मचारी रुटमार्चमध्ये सहभागी होते.
”एनआरसी आणि सीएबी”च्या विरोधात देशभर आंदोलने सुरु आहे. काही शहरांमध्ये आंदोलनाला हिंसक स्वरुप मिळाले. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये तशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सतर्कता बाळगली आहे. शुक्रवारी दुपारी विविध संघटना आंदोलन करण्यासाठी पिंपरी चौकात येणार आहेत. या संघटनांच्या पदाधिका-यांची बैठक घेऊन त्यांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.