एअर स्ट्राईकमधील मृतांचा नेमका आकडा सांगा – शरद पवार
अकलूज – भारतीय हवाई दलाच्या कारवाईवरुन मोदी सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रश्न विचारला आहे. भारताच्या वायूसेनेनं बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकमधील मृतांचा आकडा नेमका किती, याची माहिती सरकारने द्यावी, अशी मागणी शरद पवार यांनी अकलूजमध्ये केली.
शरद पवार म्हणाले की, लोकांच्या मनातील शंका दुर व्हावी, याकरिता हा आकडा सरकारने सांगायला हवा, या हल्ल्यातील मृत्यू आकड्याविषयी अनेक इंग्रजी वृत्तपत्रानी शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे शंकेला अधिक वाव मिळत आहे.
तसेच पवार म्हणाले की, आम्ही सरकार आणि सैन्याला एकमताने पाठिंबा दिला. याप्रकारात राजकारण न आणण्याची भूमिका आम्ही घेतली, आम्ही त्याच्याशी आजही प्रामाणिक आहोत. इथं आता बऱ्याच लोकांना सांगण्यात आलं की समोरच्या बाजूचे मारले गेले. आपल्या जवानांच्या शौर्याबद्दल आमच्या मनात शंका नाही. पण वाचनात असं आलं की अमेरिका आणि इंग्रजी जी वृत्तपत्र आहेत, ती असं म्हणतात की आकडा सांगा. त्यांनी शंका उपस्थित केली.
काल तीन लोकांची मी मुलाखत पाहिली, नेव्ही, एअरफोर्स आणि आर्मी. पण कुणीच आकडा सांगितला नाही. किती लोक मारले गेले हे सांगितलं नाही. त्यामुळे या शंका लोकांच्या मनात राहू नये म्हणून सरकारने लवकर त्याची माहिती जाहीर करावी. त्यांच्या नावासकट जे लोक मृत्यूमुखी पडले…
कारण जे लोक मृत्यूमुखी पडले त्याचा अर्थ त्यांची बॉडी आपल्याकडेच असणार ना? त्यामुळे ती व्यक्ती कोण, त्याचं नाव काय, त्याचा फोटो हा देऊन टाकावा, म्हणजे याबद्दलची शंका लोकांच्या मनातून जाईल.” असंही ते म्हणाले.