उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या फोननंतर काँग्रेसच्या ‘त्या’ आमदारांचे उपोषण मागे
मुंबई – विकास निधी वाटपात दुजाभाव होत असल्याचा आरोप करत आपल्याच सरकारविरोधात उपोषणाचा इशारा देणाऱ्या काँग्रेसच्या ‘त्या’ 11 आमदारांनी अखेर उपोषण मागे घेतले आहे. उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी आमदार कैलास गोरंट्याल यांना फोन करून समजूत काढल्यानंतर हे उपोषण मागे घेत असल्याचा निर्णय घेण्यात आला.
महाविकास आघाडीतील आमदारांच्या मतदारसंघात निधी वाटप करताना दुजाभाव केला जात असल्याचा आरोप जालन्यातील काँग्रेस आमदार गोरंट्याल यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. मतदारसंघात सर्वांनाच काम करायचे आहे. त्यामुळे निधीचे वाटपही समान झाले पाहिजे. मात्र तसे होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना झुकते माप दिले जाते, अशी नाराजी गोरंट्याल यांनी व्यक्त केली होती. राज्यातील काँग्रेस नेतृत्त्वाला याची कल्पना दिल्यानंतरही न्याय न मिळाल्याने गोरंट्याल यांच्यासह 11 आमदारांनी उपोषणाचा इशारा दिला होता. तसेच याबाबत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही भेटणार असल्याचे म्हटले होते.
काँग्रेसचे आमदार नाराज असतील तर तो काँग्रेस पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. निधी वाटपाबाबत त्यांचे काही आरोप, आक्षेप असतील तर अजित पवार त्यावर उत्तर देतील असे शिवसेनेकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार अजित पवारांनी आज गोरंट्याल यांना फोन केला व उपोषणाचा इशारा देणाऱ्या आमदार गोरंट्याल यांच्याशी चर्चा केली. दुजाभाव करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. यापुढे निधीवाटप करताना तुमचा प्राधान्याने विचार केला जाईल. जालना जिल्ह्यातील विकास कामांसाठीही भरीव निधी दिला जाईल, असे आश्वासन अजित पवारांनी यावेळी दिले. त्यावर समाधानी असल्याचे सांगत गोरंट्याल यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले.