उपचार झाल्याशिवाय कुणालाही रुग्णालयातून परत पाठवू नका – उद्धव ठाकरे
मुंबई | करोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय तसेच महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून त्यांना उपचार देण्यात यावेत. उपचाराविना रुग्णांना परत पाठविण्यात येऊ नये, असे आदेशच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्व रुग्णालयांना दिले आहेत. तशी अधिसूचनाच आज जारी करण्यात आली आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या या अधिसूचनेत अत्यंत महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
अन्य कुठलेही आजार नसलेल्या आणि कोविड १९ लक्षणे नसलेल्या परंतु कोविड १९ पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये पाठवावे. खासगी रुग्णालयांनी मात्र अशा रुग्णांना होम क्वारंटाइनचा शिक्का मारून घरी राहण्याचा त्यांना सल्ला द्यावा, असे अधिसूचनेत म्हटले आहे. मुंबईतील कोविड १९ रुग्णांची संख्या पाहाता या रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत कुणीही त्यापासून वंचित राहू नये तसेच कोरोना व्यतिरिक्त अन्य आजारांच्या रुग्णांनाही वेळेवर वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी मुख्य सचिव अजोय मेहता यांनी साथरोग नियंत्रण कायद्यान्वये आदेश जारी केले आहेत.