उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचं न दिलेलं आश्वासन आठवतं, पण शेतक-यांना दिलेला शब्द आठवत नाही – रावसाहेब दानवे
औरंगाबाद – मुख्यमंत्रिपदाचा न दिलेलं आश्वासन उद्धव ठाकरेंना आठवतं, पण त्यांनी जे आश्वासन राज्यातील शेतकऱ्यांना दिलं होतं, त्याचा मात्र त्यांना विसर पडला असल्याची टीका भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी केली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बागायती शेतकऱ्यांना 50 हजार आणि कोरडवाहू शेतकऱ्यांना 25 हजारांची मदत देण्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. याचा त्यांना विसर पडल्याची टिका दानवे यांनी केली आहे.
महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं रावसाहेब दानवे यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी संवाद साधला. रावसाहेब दानवेंनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह चौफेर टीका केली. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली आहे. महिलांचे रक्षण करण्यात हे सरकार अपयशी ठरलं आहे. सरकारने गुन्हेगारांना कोरोनाकाळात जामीन मंजूर करून घेतले, असा आरोप देखील रावसाहेब दानवे यांनी सरकारवर केले.
रावसाहेब दानवे म्हणाले, निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत असलेल्या प्रत्येक पक्षाचा जाहीरनामा वेगळा होता. प्रत्येकाचं आश्वासन वेगळं होतं. निवडणुकीनंतर यांचं कृत्रिम सरकार आलं. निवडणुकीनंतर हे पक्ष एकत्र आले. आमचा मित्रपक्ष आम्हाला सोडून गेला. भाजपनं मुख्यमंत्रिपदाचं आश्वासान दिलं होतं, असं खोटं सांगितलं. मात्र, भाजपनं शिवसेना मुख्यमंत्रिपदाच आश्वासनं दिलं नव्हतं, असा पुनरुच्चार करत दानवेंनी ठाकरे सरकारला टार्गेट केलं.
मराठा आरक्षणाशी केंद्र सरकारचा काय संबंध, पण तरी देखील केंद्राकडे बोट दाखवलं जात आहे. मात्र, हा राज्य सरकारचा विषय आहे. राज्य सरकार सुप्रीम कोर्टात सहकार्य करत नसल्याची माहिती अॅड. मुकूल रोहतगी यांनी दिलेली आहे, असंही ते म्हणाले.
कोरोना काळात केंद्र सरकारने व्हेंटिलेटर दिली, मास्क दिले, पीपीई किट दिले. मात्र, तरीही राज्य सरकारची बोंबाबोंब सुरूच. जलयुक्त शिवार सारख्या महत्त्वकांक्षी योजनेसाठी राज्य सरकारनं पैसे देणं बंद केलं, असा आरोप दानवेंनी केला. राज्यात विविध ठिकाणी निवडणुका होत आहेत. राज्यातील अनेक भागांचा दौरा केला. भाजपचे उमेदवार सर्व ठिकाणी विजयी होतील, असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी यावेळी व्यक्त केला.