उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे ‘गजनी’: नीतेश राणे यांनी हल्ला चढवला
मुंबई : सत्तेत असूनही विरोधकांच्या भूमिकेत वावरणाऱ्या व वेळोवेळी भूमिका बदलण्याचा आरोप होत असलेल्या शिवसेनेवर काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. नीतेश यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तुलना ‘गजनी’ चित्रपटातील आमीर खानच्या व्यक्तिरेखेशी केली आहे. उद्धव हे ‘महाराष्ट्राचे गजनी’ आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.
‘गजनी’ चित्रपटात आमीर खानला विस्मरणाचा आजार जडलेला असतो. त्यावर उपाय म्हणून आमीर खान आपल्या आयुष्यातील विविध घटना, व्यक्ती व प्रसंग शरीरावर गोंदवून ठेवत असतो. उद्धव यांचीही सध्या तशीच अवस्था असल्याचं नीतेश यांनी सूचित केलं आहे. उद्धव यांची ‘गजनी’शी तुलना करणारं एक रेखाचित्रच नीतेश राणे यांनी ट्विट केलं आहे. या चित्रावर त्यांनी शिवसेनेच्या परस्परविरोधी भूमिकांचा उल्लेख केला आहे. त्यात उद्धव यांच्या ‘भाजप आमचा मित्र पक्ष आहे,’ ‘एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला विरोध,’ ‘जीएसटीला विरोध,’ ‘कर्जमाफीला विरोध,’ ‘मी सत्तेत आहे,’ आणि ‘समृद्धीला शिवसेनेचा विरोध आहे,’ या वक्तव्यांचा समावेश आहे. ‘महाराष्ट्राचा गजनी’ असा मथळाही या चित्राला देण्यात आलाय. नीतेश यांचं हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.