‘उद्धव ठाकरेंचा उल्लेख सन्मानानेच झाला पाहिजे’, देवेंद्र फडणवीसांनी बजावलं
विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधी पक्षात चांगलीच चर्चा रंगली. यावेळी बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतकडून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करण्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर बोलताना त्यांनी कंगना रणौत आणि अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्तावावरुन ठाकरे सरकारवर टीका केली. मात्र यावेळी त्यांनी कंगना आणि अर्णबच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही असंही स्पष्ट केलं.
अर्णब गोस्वामी किंवा कंगना रणौत असतील आम्ही त्यांच्या वक्तव्याशी सहमत नाही. विरोधी पक्षनेता म्हणून मी रेकॉर्डवर सांगतोय की आमच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख योग्यच केला पाहिजे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. देशाच्या पंतप्रधानांचा उल्लेखही योग्यच झाला पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
विरोधी पक्षनेत्याचा उल्लेख कसाही केला तरी तो सक्षम आहे असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. कायद्याच्या राज्यात प्रत्येक गोष्टीला कायद्याने उत्तर द्यायचं असतं. एखाद्याने चूक केली तर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. पण आमच्याविरोधात बोललं तर पोलिसांचा वापर करु असं सुरु आहे. सोशल मीडियावर या सरकारविरोधात एकही वाक्य लिहिलं तर तुम्हाला अटक झाल्याशिवाय राहत नाही अशी परिस्थिती आहे.” अशी टीका यावेळी त्यांनी केली.
वाचाः सुधीर मुनगंटीवारांनी माझे कुटुंब, माझी जबाबदारीवरून उडवली मुख्यमंत्र्यांची खिल्ली
आमच्यावेळी विरोधात लिहिलं म्हणून कोणाला जेलमध्ये टाकलं नाही. सोशल मीडियावरील अनेक लोकांना नोटीस पाठवून एक सत्र सुरु आहे. मुस्कटबाजी सुरु आहे. माझं, सुधीर मुनगंटीवार आमचं कार्टून आलं त्यावर गलिच्छ लिहिलं त्यावर कारवाई नाही, अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. सत्ता डोक्यात जाता कामा नये. हा दुरुपयोग आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातून आपण काही शिकणार आहोत की नाही,” अशी विचारणा फडणवीसांनी यावेळी केली.
अर्णब गोस्वामीने माझ्याविरोधातही ट्रायल चालवलं होतं. तीनवेळा चालवलं होतं. एकदा तर मी अमेरिकेत असताना गुंतवणूकदारांची भेट घेत असताना ते कॅमेरे वेगळंच काम करत होते. याचा अर्थ भारतात आल्यावर मी त्यांना जेलमध्ये टाकलं नाही. तर भारतात येऊन उत्तर दिलं. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या देशात कायदा आहे, असं फडणवीसांनी यावेळी सांगितलं. कंगनाने जे ट्विट केलं त्याला आमचं समर्थन नाही. ते चुकीचं आहे. पण कायद्याचं राज्य आहे.
कोणी तुमच्याविरोधात बोललं तर अब्रनुकसानी केल्यामुळे जेलमध्ये टाका. तुमच्या मनात आलं म्हणून घर तोडता येत नाही. हे कायद्याचं राज्य आहे, पाकिस्तान नाही. हुकूमशाही नाही तर लोकशाही आहे. लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे, जो अधिकाऱाच्या पलीकडे गेला त्याला कायदा आहे. कायद्याने कारवाई करा,” असं ते म्हणाले.