उत्तर भारतात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा
नवी दिल्ली – उत्तर भारतातील बहुतेक भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. भारतीय हवामान शास्त्र संस्थेने “अंबर अलर्ट’ जारी केला असून जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्ली, चंदिगड, उत्तर प्रदेशचा पश्चिमेकडील भाग, सिक्कीम आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय या भागांमध्ये ताशी 50 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यताही आहे. महाराष्ट्रातही विदर्भासह एक दोन ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशावर पश्चिमेकडील बिघडलेल्या वातावरणाचा परिणाम दिसून येत आहे. तर ईशान्य राजस्थान, पश्चिम मध्यप्रदेश आणि हरियाणावर चक्रिवादळसदृश्य वाऱ्याची फेरी आहे. यामुळे संपूर्ण उत्तर भारतात पावसाची शक्यता आहे, असे “आयएमडी’चे अतिरिक्त महासंचालक मृत्यूंजय मोहापात्रा यांनी सांगितले.
पंजाब, आसाम, मेघालय, नागालॅन्ड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, पश्चिम मध्यप्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम राजस्थान, कर्नाटकची किनारपट्टी, केरळमध्येही पावसाची शक्यता आहे. राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे 2 मे रोजी 100 जणांचा मृत्यू झाला होता.