ईव्हीएमवर लोकांचा विश्वास न राहिल्याने बॅलेट पेपरद्वारेच मतदान झालं पाहिजे – राज ठाकरे
नवी दिल्ली – मागच्या 20 वर्षांपासून ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली जात आहे. ईव्हीएमवर लोकांचा विश्वास राहिला नसल्याने बॅलेट पेपरद्वारेच मतदान झालं पाहिजे, अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज निवडणूक आयोगाकडे केली. मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 370 लोकसभा मतदारसंघात घोळ असल्याचा दावा केला.
ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता असल्यानं आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घ्या, अशी मागणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाची भेटदेखील घेतली. गेल्या 20 वर्षांपासून ईव्हीएमवर शंका घेतली जात आहे. 2014च्या आधी भाजपानंदेखील ईव्हीएमवर संशय घेतला, परंतु 2014 नंतर त्यांचा सूर बदलला. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
आज दिल्लीत मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांनी मनसे नेत्यांसह मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आणि मागणी केली कि, 'इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबद्दलच्या वाढत्या तक्रारी आणि त्यातील वस्तुस्थिती लक्षात घेता देशातील भवितव्याचा निर्णय म्हणजे सत्ताधीशांचं गणित होऊ नये… (१/२) pic.twitter.com/CowygFS0Wr
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 8, 2019
ईव्हीएमसाठीची चिप अमेरिकेतून येत असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली. यामुळे ईव्हीएम हॅक होण्यात परकीय शक्तींचा हात असू शकतो, असंदेखील ठाकरे म्हणाले. पुढील निवडणुका मतपत्रिकेवर घ्या. यामुळे मतदारानं कोणाला मतदान केलं आहे, हे त्याला समजेल, असं राज म्हणाले. बॅलेट पेपरमुळे मतमोजणीला दोन दिवस जास्त लागतील, परंतु ज्या देशात 2 महिने लोकसभेची निवडणूक चालते. त्यात आणखी 2 दिवसांची भर पडल्यास काय फरक पडणार, जर मॅचच फिक्स असेल तर सामने खेळून काय फायदा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
निवडणूक आयोगाला ईव्हीएम संदर्भातील सर्व मुद्दे पटवून दिले आहेत. पण त्यांच्याकडून आम्हाला शून्य अपेक्षा आहेत. निवडणूक आयोगाला केवळ औपचारिकता म्हणून पत्र दिलं. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहता त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणं मूर्खपणाचं ठरेल. तुम्हीच विचाराल की, निवडणूक आयोगाला भेटलात का? म्हणून त्यांची (आयोगाची) भेट घेतल्याचं राज ठाकरे माध्यमांना म्हणाले. महाराष्ट्रात गेल्यावर ईव्हीएमबद्दल भूमिका ठरवू, असं राज यांनी सांगितलं. गतवर्षी महिन्यात सर्वच राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना यासाठी पत्र पाठवलं होतं. मात्र, तेव्हा कोणीही ऐकलं नाही. परंतु आता नक्की विचार करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.