इरफान सय्यद यांच्या मागणीची राज्य शासनाकडून दखल, माथाडी कामगारांचा पहिला हप्ता जमा
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
राज्य माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाने कोवीड-१९ च्या कालावधीत शासनाच्या आदेशान्वये मंडळातील नोंदीत कार्यरत पुणे व पिंपरी चिंचवडमधील माथाडी कामगारांना रक्कम रूपये पाच हजारापर्यंत आर्थिक सहाय्य देण्याच्या निर्णयानुसार पहिला हप्ता रक्कम रुपये ३०००/- माथाडी कामगारांच्या खात्यात जमा केला आहे.
माथाडी मंडळाच्या प्रशासकीय किंवा राखीव निधीमधून नोंदणीकृत माथाडी कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याबाबत शासनाच्या कामगार विभागाने सूचना केल्या होत्या. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील माथाडी कामगार या लाभापासून वंचित होते. यासाठी शिवसेनाप्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते इरफान सय्यद यांनी राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील व पिंपरी चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाचे अध्यक्ष/सचिव यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अखेर शासनाने त्यांच्या मागणीची दखल घेऊन माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला आहे.
इरफान सय्यद माहिती देताना म्हणाले की, कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य कामगार विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या माथाडी मंडळातील नोंदणीकृत माथाडी कामगारांचा सरकारने अत्यावश्यक सेवा देणाऱ्या घटकांमध्ये समावेश केलेला आहे. त्यांना अर्थसहाय्य मिळावे यासाठी दि. २२.०७.२०२० रोजीच्या पत्रान्वये कामगार विभागाने राज्यातील माथाडी मंडळांना माथाडी मंडळाच्या प्रशासकीय किंवा राखीव निधीमधून नोंदणीकृत माथाडी कामगारांना अर्थसहाय्य देण्याबाबत सूचना केल्या होत्या. याचा लाभ पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील माथाडी कामगार मंडळ वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांना मिळाला आहे.
मात्र, दोन्ही शहरातील कामगार लाभापासून वंचित होते. त्यासाठी राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील व पिंपरी चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाचे अध्यक्ष/सचिव यांच्याकडे पाठपुरावा केला. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील माथाडी कामगारांना लाभापासून वंचित न ठेवता त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याची मागणी केली होती. अखेर या मागणीला यश आले असून, राज्य शासनाने पुणे व पिंपरी चिंचवडमधील सुमारे ४५०० कामगारांच्या खात्यावर प्रत्येकी ३००० रुपयांची आर्थिक मदत जमा केली आहे. या मागणीची दखल घेतल्यामुळे माथाडी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. कामगारांची दखल घेतल्याबद्दल सरकारचे आभार मानतो.
यासाठी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे सल्लागार बाळासाहेब शिंदे, कार्याध्यक्ष परेश मोरे, जनरल सेक्रेटरी प्रविण जाधव, किसन बावकर, सेक्रेटरी भिवाजी वाटेकर, मुरलीधर कदम, खंडू गवळी, उपाध्यक्ष ज्ञानोबा मुजूमले, सेक्रेटरी पांडूरंग कदम, सर्जेराव कचरे या पदाधिका-यांनी परिश्रम घेतले, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद यांनी दिली.