इयत्ता पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता इयत्ता पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम 25 टक्के कमी करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. नुकतंच याबाबतचा शासनानं निर्णय जाहीर केलाआहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली.
“कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी इ. 1 ली ते इ. 12 वी साठी सुमारे 25% पाठ्यक्रम कमी करण्याच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या प्रस्तावास शासन मान्यता देण्यात आली,” असे ट्विट शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.
शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी कोव्हिड -१९ या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी चा पाठ्यक्रम 25 टक्के कमी करण्यास शासन मान्यता देत आहे. सदर कमी केलेल्या पाठ्यक्रमाची यादी संचालक, राज्य शैक्षणिक आणि संशोधन परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करावी. तसेच याबाबत शाळांना, विद्यार्थ्यांना तसेच पालकांना अवगत होण्यासाठी आवश्यक प्रसिद्धी द्यावी, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे