इंद्रायणी नदीत आढळले हजारो मृत मासे
संत तुकोबांच्या देहूतील इंद्रायणी नदीत हजारो मासे मृत अवस्थेत आढळले आहेत. अवघ्या पंधरा दिवसांवर आषाढी वारी येऊन ठेपली आहे. अशातच एवढ्या मोठ्याप्रमाणात मृत मासे आढळल्याने खळबळ उडाली आहे. ‘रान जाई’ या संस्थेचे सदस्य रविवारी सकाळी सात वाजता जलपर्णी काढण्यासाठी आले असता, त्यांना हे मृत मासे आढळून आले. सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मृत मासे काढण्याच काम सुरू होते.
प्राप्त माहितीनुसार, देहूनगरीतील इंद्रायणी नदीत तब्बल १५ हजारांच्या जवळपास मृत मासे आढळले आहेत. रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास रानजाई संस्थेचे सोमनाथ आबा मसूडगे हे इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यासाठी काही सदस्यांसह आले होते. तेव्हा, त्यांना नदीमध्ये मृत मासे आढळले. सकाळी सात वाजेपासून शंभर ते दीडशे व्यक्ती सायंकाळी सहा पर्यंत हे मृत मासे नदीतून बाहेर काढत होते. या घटनेमुळे वारकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. या घटनेमुळे नदीचे पावित्र धोक्यात आले असल्याची भावना व्यक्त होता आहे. आषाढी वारी निमित्त लाखो वारकरी येथील इंद्रायणी नदीत स्नान करत असतात. मात्र, या प्रकारामुळे नदीत मैलायुक्त सांडपाणी आणि रासायनिक पाणी सोडले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
पोलिसांकडून पंचनामा झाल्यानंतर मृत माश्यांवर पुढील प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. २० वर्षांपूर्वी अशाच प्रकारे इंद्रायणी नदीत मृत मासे आढळल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात या प्रकरणाचा छडा लावून यास कारणीभूत असलेल्यांवर कारवाई होणार का? हे पाहावे लागणार आहे.