‘आयसीएमआर’चा अजब दावा..म्हणतात, भारतात राष्ट्रीय पातळीवर कोरोना विषाणूचा सामुदायिक संसर्ग अजूनही नाही
नवी दिल्ली | इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) दावा केला आहे की भारतात राष्ट्रीय पातळीवर कोरोना विषाणूचा सामुदायिक संसर्ग अजूनही नाही. देशात कोरोनाबाधितांची संख्या २,८६,५७९ वर गेलेली असताना आयसीएमआरने हा दावा केला. गुरुवारी देशात ९,९९६ नवे रुग्ण आढळले. सलग नवव्या दिवशी देशात ९ हजारहून अधिक रुग्ण आढळले. ३५७ मृत्यूंमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या ८,१०२ झाली. मात्र, यात एकूण रुग्णांपैकी ४९.२ टक्के म्हणजे १,४१,०२८ रुग्ण पूर्णपणे बरे झाले. ही पण समाधानाची बाब आहे.
केंद्र सरकारच्या नियमित पत्रकार परिषदेत आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, सामुदायिक संसर्गावर सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या सामुदायिक संसर्गाची कोणतीही ठोस व्याख्या केलेली नाही. भारत अत्यंत माेठा देश आहे. तरीही कोरोनाचा संसर्ग तुलनेने खूप कमी आहे. छोट्या जिल्ह्यांमध्ये तर तो १ टक्क्याहून कमी आहे. शहरी भागात हा संसर्ग अधिक असल्याचे दिसून येते. सध्या देशात असलेल्या कंटेनमेंट झोनमध्ये या रोगाचा प्रसार अधिक असू शकतो. मात्र, अजूनही सामुदायिक संसर्ग सुरू झालेला नाही हे आम्ही निश्चितपणे सांगू शकतो, असे भार्गव म्हणाले. या स्थितीत रोगाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रॅकिंग आणि क्वाॅरंटाइनचे धोरण कायम ठेवावे लागेल.