आप आणि गृहमंत्रालयामध्ये वकिल नेमण्यावरून वाद
नवी दिल्ली – दिल्ली सरकार मध्ये आता मुख्य सचिव अन्शु प्रकाश यांच्या संबंधातील खटल्यासाठी सरकारी वकिल नेमण्यावरून आम आदमी पक्ष आणि गृह मंत्रालयात वाद सुरू झाला आहे. अन्शु प्रकाश यांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल याच्या निवासस्थानी झालेल्या धक्काबुक्कीच्या प्रकरणाचा खटला आता न्यायालयात गेला आहे.
गृहमंत्रालयाने दिल्ली पोलिसांच्या शिफारशी वरून या प्रकरणी अन्शु प्रकाश यांची बाजू मांडण्यासाठी तीन ज्येष्ठ वकिलांची नियुक्ती करण्याची शिफारस गृहमंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडे केली आहे. तथापी जैन यांनी ही मागणी धुडकाऊन लावली असून मुख्य सचिवांनी दिल्ली सरकारच्या नियमीत सरकारी वकिलांचीच यासाठी मदत घ्यावी अशी सुचना मंत्र्यांनी मुख्य सचिवांना केली आहे.
अन्शु प्रकाश यांच्यासाठी मोहीत माथूर, व्ही मधुकर आणि सिद्धार्थ आगरवाल या तीन जेष्ठ वकिलांची नेमणुक करावी अशी विनंती सत्येंद्र जैन यांना करण्यात आली होती. पण त्यांनी ती अमान्य केली आहे. या खटल्यात मुख्य सचिवांची बाजू कमकुवत व्हावी यासाठी आम आदमी पक्षाचे सरकार मुद्दामच हा खोडसाळपणा करीत आहे असा आरोप भाजपचे नेते विजेंद्र गुप्ता यांनी केला आहे.