आपण मुलांना कॉन्व्हेन्ट शाळांमध्ये शिकवतो त्यामुळे ते गोमांस खातात – केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह
दिल्ली | महाईन्यूज
आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत राहणारे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलेले आहे. “आपण मुलांना मिशनरींच्या शाळेत शिकवतो त्यामुळे ते पुढे जाऊन गोमांस खातात” असं त्यांनी वक्तव्य केले आहे. सिंह म्हणाले, “शाळांमध्ये मुलांना भगवतगीता शिकवायला हवी आहे. मात्र, आपण आपल्या मुलांना मिशनरींच्या शाळांमध्ये टाकतो. त्यानंतर ते आयआयटीमध्ये शिकतात, इंजिनिअर होतात आणि नंतर परदेशात जातात आणि यांच्यापैकी बहुतेक जण गोमांस खातात, का? कारण आपण त्यांना आपली संस्कृती आणि पारंपारिक मुल्ये शिकवत नाही.”
गिरिराज सिंह यांनी गोमांस खाण्याचा संबंध थेट कॉन्व्हेन्ट शाळांशी जोडला आहे, त्यामुळे वाद होण्याची चिन्हे आहेत. या शाळांऐवजी मुलांना इतर शाळांमध्ये शिकवणे गरजेचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कॉन्व्हेन्टच्या शाळांमध्ये शिकल्याने मुलं आयआयटीत जाऊन इंजिनिअर होतात आणि परदेशवात जाऊन तिकडे गाोमांस खायला शिकतात असा दावाही त्यांनी केला आहे.