“आधी दहशतवाद थांंबवा”; विराटला पाकिस्तानमध्ये खेळायला सांगणाऱ्यावर चाहते बरसले
मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये होणाऱ्या क्रिकेट मालिका बंद झाल्या. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने अनेकदा क्रिकेट मालिकांबाबत पुढाकार घेण्याचा प्रयत्न केला. पण जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी संघटनांवर कारवाई करत नाही तोपर्यंत भारत पाकिस्तानात क्रिकेट खेळणार नाही; तसेच पाकिस्तानलाही भारतात येऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका केंद्र सरकारने घेतली.
तब्बल ११ वर्षे भारत आणि पाकिस्तान हे संघ एकमेकांविरोधात द्विपक्षीय मालिका खेळलेले नाहीत. केवळ विश्वचषक स्पर्धा, चॅम्पिअन्स ट्रॉफी, आशिया कप या स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तानचा संघ आमनेसामने आला. या साऱ्या गोष्टींदरम्यान, पाकिस्तानच्या एका चाहत्याने विराट कोहलीला पाकिस्तानात क्रिकेट खेळण्याची विनंती केली आहे.
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका टी-२० सामन्यादरम्यान शाहबाज कासमी या तरुणाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन विराट कोहलीला ही विनंती केली. त्याने स्वत:चा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत तो हातात एक बॅनर घेऊन उभा आहे. “विराट कोहली, तू पाकिस्तानात ये आणि येथे क्रिकेट खेळ अशी आमची साऱ्यांची ईच्छा आहे. आम्हा साऱ्यांचे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझा खूप मोठा चाहता आहे”, असे त्याने त्या ट्विटमध्ये लिहिले आहे.
या ट्विटवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या. ‘पाकिस्तानने आधी दहशतवाद थांबवावा’, असे चाहत्यांनी त्या पाकिस्तानी चाहत्याला सुनावले.