आधारचे संकेतस्थळ बंद पडल्याने कामकाज ठप्प
पुणे – शहर व जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत व खासगी बँका, टपाल कार्यालये, नागरी सुविधा केंद्र आणि महापालिकांची क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आधार केंद्र सुरु करण्यात आली आहे. यामुळे सध्या जिल्ह्यात सरासरी ३५० हून अधिक आधार नोंदणी केंद्र पूर्ण क्षमतेने सुरु असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. परंतु गेल्या तीन दिवसांपासून भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (यूआयडीएआय) चे संकेतस्थळ बंद पडले असून, यामुळे केंद्रांवर नोंदणी व दुरुस्तीचे काम ठप्प आहे. यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढला आहेत.
शासनाने सुरुवातील खासगी कंपन्या मार्फत आधार नोंदणी सुरु केली होती. परंतु या खासगी व्यक्तींकडून आधार नोेंदणीसाठी नागरिकांकडून बेकायदेशीर पणे पैसे घेतले जात असल्याच्या अनेक तक्रारी आला.त्यानंतर शासनाने खासगी कंपन्यांकडून हे काम काढून घेतले व शासनाच्याच महाआॅनलाइन या कंपनीकडे हे काम सोपविले. महाआॅनलाइनला आधारची ही मोठी यंत्रणा झेपली नाही. याबरोबरच राज्य शासनाने विविध अधिसूचना काढून पुन्हा रद्द करणे, महाआॅनलाइन आणि खासगी कंपन्यांमधील टक्केवारीचा वाद, तांत्रिक बाबी आणि किचकट प्रक्रिया अशा विविध कारणांमुळे जून २०१७ पासून शहर आणि जिल्ह््यातील आधार यंत्रणा ठप्प झाली होती. या काळात जिल्हाभरात मिळून एकूण केवळ चाळीस आधार केंद्रे सुरू होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने महाआॅनलाइन, यूआयडीएआय यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून आधार केंद्रे वाढविण्याचा प्रयत्न केला.
आधार यंत्रे दुरुस्तीचे अधिकार स्थानिक पातळीवर मिळावेत आणि खासगी आधार यंत्रचालकांनी शासकीय इमारतींमध्ये आधारची कामे करण्याला परवानगी द्याावी, अशा जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांना डिसेंबरमध्ये मान्यता देण्यात आल्यानंतर शहर आणि जिल्ह््यातील आधार केंद्रे पूर्ववत होण्यास सुरुवात झाली.
देशातील प्रत्येक जिल्ह्यातील बँकांनी त्यांच्या दहा शाखांमागे एक आधार नोंदणी केंद्र सुरू करावे, असा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्याबाबतचा अध्यादेशही केंद्राकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याकरिता देशातील प्रत्येक जिल्ह्यासाठी केंद्र शासनाकडून १२९ आधार यंत्रे पुरविण्यात आली आहेत, अशी माहिती आधार समन्वयक अधिकारी मनोज जाधव यांनी दिली.