आता महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुका होणार!
पुणे – नवीन विद्यापीठ कायद्यात महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुकाची तरतूद होती. ह्या महाविद्यालयीन निवडणुका कशा पद्धतीने घ्यावेत, त्याविषयीचे परिनियम राज्य शासनाने आज जाहीर केले. त्यानुसार येत्या 30 जुलैपूर्वी विद्यार्थी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे आवश्यक आहे. त्यामुळे आता महाविद्यालयीन निवडणुका घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. पुढच्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यायलीन निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नवीन विद्यापीठ कायदा अर्थात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 1 मार्च 2017 लागू झाला. यात विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या निर्णयात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने महाविद्यालय स्तरावर विद्यार्थी निवडणुका घेण्याची तरतूद करण्यात आली. मात्र या निवडणुका विषयी काहीच स्पष्टता नव्हती. कोणत्या आधारावर व निकषावर निवडणुका घ्यायचा, असा प्रश्न प्राचार्यांनी उपस्थित केला होता. त्यासाठी आवश्यक असणारे परिनियमच राज्य शासनाने प्रसिद्ध न केल्याने यंदाच्या वर्षी निवडणूक होऊ शकले नाहीत. परिनियम विद्यापीठ व महाविद्यालयांना प्राप्त न झाल्याने विद्यार्थी निवडणुका विषयी सर्वत्र सांशकता निर्माण होती. त्या पार्श्वभूमीवर आता उच्च शिक्षण विभागाने परिनियम जाहीर केले आहेत. त्यात निवडणुका घेण्याविषयीचे नियम, आचारसंहिता, पात्रता या सर्व बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे.
विद्यार्थी निवडणुकांची 30 सप्टेंबर “डेडलाईन’
परिनियमात विद्यार्थी निवडणुकांचा कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करण्यात आली. महाविद्यालयाचा प्राचार्य किंवा संस्थेचा संचालक हा विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीसाठी प्राधिकारी असतील. ही निवडणूक मतपत्रिकेद्वारे होईल. कुलगुरूंशी विचारविनिमय विद्यार्थी निवडणुकीचा कार्यक्रम तयार करतील. यात निवडणुका घेणे, अधिसूचना काढणे, प्रसिद्धी आणि निवेदने यासंबंधीचा वेळापत्रक 31 जुलैपूर्वी जाहीर करणे आवश्यक आहे. ही सर्व निवडणुका प्रक्रिया 30 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे.
”नवीन विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार आता महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुका होतील. ह्या निवडणुका कोणत्या नियमानुसार घ्यावेत, याविषयी परिनियम उच्च शिक्षण विभागाने प्रसिद्ध केले. त्यात उमेदवारांची पात्रता, आचारसंहिता, नियमावलीचा समावेश आहे. त्यानुसार आता शैक्षणिक संस्थांना विद्यार्थी निवडणुका घेणे सहजशक्य होणार आहे. विद्यापीठाच्या निर्णयप्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग होण्याच्या दृष्टीने ह्या निवडणुकांचा परिनियम प्रसिद्ध होणे ही बाब स्वागतार्ह आहे.”
डॉ. ए. पी. कुलकर्णी, विद्यापीठ विकास मंच, प्रांतप्रमुख