आतापर्यंत राज्यातील 10 हजार 317 रुग्ण झाले कोरोनामुक्त
मुंबई | राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार २९७ झाली आहे. आज २२५० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ६७९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १० हजार ३१८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २६ हजार ५८१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ०७ हजार ७२ नमुन्यांपैकी २ लाख ६७ हजार ७७५जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३९ हजार २९७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ०४ हजार ६९२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २६ हजार ७५२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात ६५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या १३९० झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ४१, पुण्यात १३, नवी मुंबईमध्ये ३, पिंपरी- चिंचवड -२, सोलापूरात २, उल्हासनगरमध्ये २, तर औरंगाबाद शहरात २ मृत्यू झाले आहेत. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४६ पुरुष तर १९ महिला आहेत. आज झालेल्या ६५ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३२ रुग्ण आहेत तर ३१ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर २ जण ४० वर्षांखालील आहे. या ६५ रुग्णांपैकी ४८ जणांमध्ये (७४ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.