आणिबाणीच्या काळात कॉंग्रेसने साऱ्या देशाचेच कारागृह केले
- कॉंग्रेस व गांधी घराण्यावर मोदींची टीका
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत आणिबाणीच्या घटनेला 43 वर्ष झाल्याच्या निमीत्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात कॉंग्रेस पक्ष व गांधी-नेहरू कुटुंबावर घणाघाती टीका केली. आणिबाणीच्या काळात गांधी कुटुंबाने केवळ आपल्या स्वत:च्या स्वार्थासाठी साऱ्या देशाचे कारागृहात रूपांतर केले होते असे मोदी यांनी म्हटले आहे.
आणिबाणीच्या 43 व्या वर्षदिनानिमीत्त भाजपतर्फे आज मुंबईत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी बोलताना ते म्हणाले की देशाच्या ऐतिहासिक सुवर्ण काळावर आणिबाणी हा एक काळा डाग आहे. केवळ कॉंग्रेसवर टीका करण्यासाठी म्हणून नव्हे तर घटना आणि देशाच्या लोकशाहीच्या संरक्षणासाठी जनजागृती करण्यासाठी आणिबाणीच्या विरोधात ही जनजागृती करण्याची गरज आहे असे ते म्हणाले. कॉंग्रेसने आज घटना धोक्यात असल्याचा घोशा लाऊन लोकांपुढे भयाचा संभ्रम निर्माण केला आहे.
आमच्या काळात दलित आणि मुस्लिमांपुढे धोकादायक स्थिती निर्माण झाली असल्याचे सांगितले जात आहे. पण त्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी स्वत:चा पक्षच धोक्यात आणला आहे. त्यांच्यात सुधारणा होण्याची कोणतीही शक्यता नाही. कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यानंतर तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राजीनामा देणे अपेक्षित होते पण त्यांनी राजीनामा न देता देशात आणिबाणी लागू करीत लोकशाहीचा गळा घोटला. त्यांच्यासाठी लोकशाहीं आणि देशाला काहीच किंमत नाही. सर्वांचीच त्यांनी कशी गळचेपी केली हे सांगताना ते म्हणाले की प्रख्यात गायक किशोर कुमार यांनी कॉंग्रेसचे गीत गाण्यास नकार दिल्याने त्यांच्या गाण्यांना रेडिओवर बंदी घातली गेली.
लोकसभेतील त्यांच्या जागा 400 वरून 44 वर आल्यावर त्यांना ईव्हीएम मशिनची आठवण झाली. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर मात्र त्यांनी ईव्हीएम मशिन्सवर शंका घेतली नाही असे ते म्हणाले. कॉंग्रेसने तत्कालिन सरन्यायाधिशांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव दाखल केला होता याचीही आठवण मोदींनी करून दिली. आपल्याला कोर्टाकडून भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामना करावा लागेल असे त्यांना कदापिही वाटले नव्हते म्हणून त्यांनी थेट सरन्यायाधिशांच्या विरोधातच महाभियोग आणला असे ते म्हणाले.
आपले सरकार घटनेचे रक्षण करण्यास वचनबद्ध आहे असे नमूद करून ते म्हणाले की आमच्यासाठी घटना हे केवळ एक पुस्तक नाहीं तर ते सामान्य लोकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिक आहे. आणिबाणीच्या विरोधात ठामपणे लढा देणाऱ्या माध्यमांनाहीं त्यांनी यावेळी धन्यवाद दिले. त्यासाठी त्यांनी इंडियन एक्स्प्रेसचे रामनाथ गोयंका, कुलदीप नय्यर, आदिंच्या नावांचा उल्लेख केला. कुलदीप नय्यर यांनी आमच्यावरही टीका केली असली तरी त्यांनी लोकशाहीसाठी त्यावेळी दिलेल्या लढ्याचे आम्हाला कौतुकच आहे असेही मोदींनी यावेळी नमूद केले