आज मुंबई आणि पुण्याकडे कोल्हापुरातून जाणारा दूध पुरवठा बंद
मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस अधिकच तापत चालला आहे. सरकारने आश्वस्त केले असले तरी मराठा समाज अधिक आक्रमक झाला असून मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. आज दूध पुरवठ्याला ब्रेक लावण्याचे पाऊल समाजाने उचलले आहे. मराठा आरक्षण प्रश्नी पुढील निर्णय होईपर्यंत नोकर भरती थांबवण्याच्या मागणीकडे राज्य सरकारने दुर्लक्ष करत पोलीस भरतीचा निर्णय घेतल्याने सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. या विरोधात आजपासून मुंबई आणि पुण्याला कोल्हापुरातून होणारा दुधाचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आज सकाळी नऊ वाजल्यापासून मुंबई आणि पुण्याकडे कोल्हापुरातून जाणारा दूध पुरवठा बंद करण्यात आला आहे. आंदोलन अधिक व्यापक करण्यासाठी प्रसंगी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात येणार आहे. दरम्यान, मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने २३ सप्टेंबर रोजी गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरात ही गोलमेज परिषद होत आहे. यामध्ये ५० हून अधिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. दुसरीकडे खासदार उदनराजे भोसले मराठा आरक्षण प्रश्नी आक्रमक झाले आहेत. त्यांनी दहा मागण्यांचं एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानंतर यासंदर्भात पुढील आदेश होईपर्यंत राज्य सरकारने नोकर भरती थांबवावी, विद्यार्थ्यांना सध्या ज्या सवलती मिळतात त्या सुरू ठेवाव्यात, याबाबत तीन दिवसात निर्णय जाहीर करावा, अशी मागणी सकल मराठा समाजाने चार दिवसांपूर्वी केली होती. बुधवारपर्यंत यासाठी मुदत दिली होती. या मुदतीत राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही, उलट पोलीस भरतीचा निर्णय जाहीर केला. यामुळे संतप्त झालेल्या सकल मराठा समाजाने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुढील लढ्याची दिशा ठरवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बुधवारी झाली. या बैठकीत सर्व पक्षांनी सरकारसोबत उभं राहण्याचा शब्द दिला