आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धनगर आरक्षणाचा मुद्दा तापणार
मुंबई : लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार आहे. राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात धनगर समाजाच्या विविध संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. रविवारी पंढरपूर येथे झालेल्या धनगर समाजाच्या मेळाव्यात भाजपला सत्तेतून हद्दपार करण्याचा निश्चय करण्यात आला. बुधवारी मुंबईत आझाद मैदानावर धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन करीत आरक्षणाची मागणी केली. काँग्रेसने या दोन्ही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
गत लोकसभा निवडणुकीत धनगर आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने काँग्रेस आघाडी सरकारकडे आरक्षणाची मागणी करण्यात आली होती. अनुसूचित जमाती संवर्गातून धनगर समाजाला आरक्षण मिळावे, अशी त्यांची मागणी आहे. परंतु त्यावर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काहीही निर्णय घेतला नाही. त्याचा भाजपने फायदा घेतला. सत्तेवर आल्यानंतर धनगर समाजाला अनुसूचित जमाती संवर्गातून आरक्षण देण्याचे भाजपने आश्वासन दिले होते; परंतु प्रत्यक्ष राज्याची सत्ता मिळाल्यानंतर गेल्या साडेतीन वर्षांत हा विषय भिजत ठेवला गेला. त्यामुळे या समाजात आता नाराजीचे वातावरण आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाच्या काही संघटनांनी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे.