अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच सेन्सेक्सची 800 अंकांनी उसळी
मुंबई – देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत २०२१-२२ या वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. शेअर मार्केटकडूनही अर्थसंकल्पाचे जोरदार स्वागत करण्यात आले. आज अर्थमंत्र्यांकडून अर्थसंकल्प वाचन सुरू असतानाच शेअर मार्केटमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. दिवसाच्या सुरुवातीला आज बाजार 401 अंकांनी वधारला. तर सेन्सेक्सने थेट 800 अंकांनी उसळी घेतल्याने तो 47,185.75 अंकांवर पोहोचला.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 11 वाजता भाषण करण्यास सुरुवात केली, तेव्हा बाजारात तेजी दिसून आली. 11.17 वाजता बीएसई 526 अंकांनी वाढून 46,812.42 वर स्थिरावला, तर निफ्टीचा व्यापार 13,773.25 वर होता. तर 12.02 वाजता शेअर बाजाराने 900 हून अधिक अंकांची कमाई केली. यावेळी बीएसई 47,204.78 अंकांवर, तर निफ्टी 13,889.90 अंकांवर होती. दरम्यान, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, इंडसइंड बँक, भारती एअरटेल, गृहनिर्माण विकास वित्त महामंडळ आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने आज सुरुवातीपासूनच सलामी दिल्याचे पाहायला मिळाले.