अमेरिकेचा दबाव झुगारून भारत रशियासोबतची मैत्री निभावणार
नवी दिल्ली : रशियाकडून पाच अत्याधुनिक एस-400 ट्रायम्फ हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र यंत्रणा प्राप्त करण्याच्या दिशेने भारत वाटचाल करत आहे. अमेरिकेकडून निर्बंध लादले जाण्याची शक्यता असून देखील संरक्षण मंत्रालयाने सुमारे 39 हजार कोटी रुपयांच्या या व्यवहाराच्या मार्गातील अडचणी दूर करण्याचे प्रयत्न चालविले आहेत.
संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण खरेदी परिषदेने (डीएसी) या व्यवहाराशी संबंधित ‘किरकोळ बदलां’ना अनुमती दिली आहे. एस-400 च्या खरेदीचे प्रकरण आता मंजुरीसाठी अर्थमंत्रालय आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील संरक्षण विषयक मंत्रिमंडळ समितीसमोर पाठविले जाईल.
एस-400 ट्रायम्फ हवाई सुरक्षा यंत्रणा शत्रूच्या सामरिक नौका, टेहळणी विमाने, क्षेपणास्त्रs आणि ड्रोन्स 400 किलोमीटरच्या पल्ल्यापर्यंत आणि आकाशात 30 किलोमीटर उंचीवर नष्ट करू शकते. भारतासाठी ही यंत्रणा ‘गेमचेंजर’ ठरणार असल्याचे बोलले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्यात ऑक्टोबर 2016 मध्ये गोवा येथे पार पडलेल्या बैठकीत पाच एस-400 यंत्रणांच्या खरेदीबद्दल सहमती झाली होती. यंदा ऑक्टोबर महिन्यात मोदी आणि पुतीन यांच्यात होणाऱया बैठकीपूर्वी याबद्दलच्या कराराला अंतिम रुप देण्याची तयारी सुरू आहे. तर अमेरिकेने या व्यवहाराबद्दल भारताला निर्बंधांचा इशारा दिला आहे.