अमरावतीत काँग्रेस नेत्यांचा सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न
अमरावती : नाफेडची केंद्र त्वरित सुरू करून, तूर, हरभ-याचे चुकारे त्वरित करावे, यासह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव आ. यशोमती ठाकूर, आ. वीरेंद्र जगताप व जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात सोमवारी जिल्हा कचेरीवर सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत काँग्रेस नेत्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडल्याने अनुचित प्रसंग टळला.
शेतक-यांच्या प्रश्नांवर शासन टाळाटाळ करीत आहे. किंबहुना शासनाचे शेतकरी विरोधी धोरण असल्यामुळे खरिपाच्या तोंडावर आर्थिक अडचणीतील शेतक-यांवर आत्महत्येची वेळ आली. आम्ही शेतक-यांना मरू देणार नाही, प्रसंगी आम्ही शेतक-यांसाठी जीव द्यायला तयार आहोत, ही भूमिका घेत काँग्रेस नेत्यांनी शासन धोरणाचा निषेध करीत सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हा कचेरीवर धडक दिली व रॉकेल अंगावर घेऊन सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित पोलिसांनी वेळीच रॉकेलसह कीटकनाशकाची बॅग ताब्यात घेऊन आत्मदहणाचा प्रयत्न हाणून पाडला.
२९ मे रोजी काँग्रेस पक्षाद्वारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शेतकºयांच्या मागण्या रेटून धरल्या होत्या. दोन दिवसात मागण्यांची पुर्तता न झाल्यास १ जूनला सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र, राज्याचे कृषिमंत्री पांडूरंग फुंडकर यांचे निधन झाल्यामुळे त्या दिवशीचे आंदोलन स्थगित करून ते सोमवारी करण्यात आले.