breaking-newsराष्ट्रिय

अभिनंदनचे वडील आहेत माजी एअर मार्शल, जाणून घ्या त्यांचे कारगिल आणि मिराज कनेक्शन

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय हवाई दलाचे मिग २१ विमान कोसळले. या विमानातील वैमानिक बेपत्ता असल्याचं परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटलं आहे. तर पाकिस्ताननं हा वैमानिक आपल्या ताब्यात असल्याचं म्हटलं आहे. विंग कमांडर अभिनंदन वर्थमान असं या वैमानिकाचं नाव आहे. आता अभिनंदनला सुखरूप परत आणा असं त्याच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. याशिवाय सोशल मिडियावरही अनेक सेलिब्रिटीजने #BringBackAbhinandan तसेच #GivebackAbhinandhan हे हॅशटॅग वापरून अभिनंदला सुखरुप परत भारतात आणण्याची विनंती दोन्ही देशाच्या राज्यकर्त्यांकडे केली आहे. दरम्यान अभिनंदनचे वडीलही हवाई दलामध्ये कार्यरत होते अशी माहिती आता समोर येत आहे. अभिनंदनचे वडील सिमहाकुट्टी वर्थमान हे एअर मार्शल पदावर कार्यरत होते. त्यांनी ईस्टर्न एअर कमांड चीफ म्हणून हवाई दलात काम केले आहे. कारगिल युद्धाच्या काळतही महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या वैमानिकांपैकी ते एक होते. ते सध्या आपल्या सेवेतून निवृत्त झाले असून त्यांचा मुलगा अभिनंदन हा २००४ पासून हवाई दलामध्ये कार्यरत आहे.

सिमहाकुट्टी वर्थमान १९७३ साली भारतीय हवाई दलामध्ये वैमानिक म्हणून रुजू झाले. त्यांना एकूण चार हजार हून अधिक तास विमान उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांना ४० वेगवेगळ्या प्रकारच्या विमान उड्डाणाचा अनुभव आहे. २०११ साली भारतीय हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, ‘सी. वर्थमान हे कारगिल युद्धाच्या वेळी ग्वालेयर येथील हवाई तुकडीचे प्रमुख होते. त्यांनी विमान उड्डाणाचा आपला अनुभव वापरत मिराज २००० च्या यशस्वी उड्डाणात महत्वपूर्ण कामगिरी केली. त्यांच्या या योगदानामुळे त्यावेळी भारतीय हवाई दलाला मोठे यश मिळाले.’ योगायोग म्हणजे सी. वर्थमान यांनी कारगिलच्या वेळी ज्या मिराज २००० संदर्भातील महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली तीच विमाने २६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्धवस्त करण्यासाठी भारतीय हवाई दलाने वापरली. हाच हवाई हल्ल्याला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानने एफ १६ विमाने भारतीय हवाई हद्दीत घुसवली. त्या विमानांना पिटाळून लावण्यासाठी भारताने मीग २१ विमाने पाठवली. याच विमानांपैकी एक विमान पाकिस्तानच्या हद्दीमध्ये पडले. या विमानाचा वैमानिक असणारा सी वर्थमान यांचा मुलगा अभिनंदन वर्थमान वेळीच विमानातून इजेक्ट झाल्याने सुखरुप बचावला. मात्र अभिनंदन पाकिस्तानच्या हद्दीत उतरल्याने त्याला पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतले आहे.

दरम्यान २००१ साली संसदेवर झालेल्या हल्ल्याच्या काळामध्येही सी. वर्थमान हे वेस्टर्न एअर कमांडमध्ये कार्यरत होते. त्यावेळी भारत- पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button