अती उष्णतेमुळेच व्हिव्हिपॅटमध्ये बिघाड
निवडणूक आयोगासमोर विशेष पथकाकडून अहवाल सादर
नवी दिल्ली – उत्तरप्रदेशात कैराना आणि महाराष्ट्रात भंडारा-गोंदिया येथे नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकी दरम्यान व्हिव्हिपॅट या मतदान यंत्रणेमध्ये अती ऊन आणि प्रकाशामुळे झाल्याचे प्राथमिक तपासणीत आढळले आहे. याबाबत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या विशेष पथकाने अहवाल सादर केला आहे.
या पथकांनी केलेल्या तपासात दोन प्रमुख कारणे आढळली. व्हिव्हिपॅट यंत्रांमधील कॉन्ट्रास्ट सेन्सर व लेन्थ सेन्सरमध्ये बिघाड झाला. हे दोन्ही बिघाड मतदान केंद्रांवर असलेल्या अती ऊन आणि प्रकाशामुळे झाल्याचे प्राथमिक तपासणीत आढळले आहे.
या बिघाडांवर उपाययोजना करण्यासाठी, यंत्राच्या उत्पादक कंपन्या आणि तंत्रज्ञ यांनी सूचना द्याव्यात अशी विनंती आयोगाने केली आहे. या यंत्रांची पुन्हा एकदा नीट तपासणी करुन ते निर्दोष स्वरूपात द्यावेत, असे आयोगाने संबंधित मंत्रालयांना म्हटले आहे.
अती प्रकाश किंवा उन्हामुळे या यंत्रांमध्ये बिघाड होणार नाहीत यासाठी आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याचे निर्देशही तंत्रज्ञांना देण्यात आले आहेत. तसेच मानवी चुका पूर्णपणे टाळण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याना पुन्हा एकदा प्रशिक्षण देण्याचाही निर्णय आयोगाने घेतला आहे.