अजित पवारांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावनांचा गांभिर्याने विचार करावा
- शहराध्यक्ष सचिन साठे यांची पवार यांना सूचना
- कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त झाली नाराजी
पिंपरी, महाईन्यूज, प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील काँग्रेसचे मतदान राष्ट्रवादी काँग्रेसचे पाहिजे मग काँग्रेसचा उमेदवार का नको? असा प्रश्न पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी उपस्थित केला आहे.
भाजपा सेनेसारख्या जातीयवादी पक्षांविरोधात लढा उभारताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी समविचारी पक्षांनादेखील बरोबर घेणे व त्यांचा आदर राखणे आवश्यक आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचे जागा वाटप अद्याप झालेले नसतानाही शनिवारी काळेवाडी येथे झालेल्या मेळाव्यात शहरातील तीनही जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार असल्याचे अजित पवार यांनी जाहिर केले. त्यामुळे शहरातील काँग्रेसचे कार्यकर्ते दुखावले आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना लेखी पत्राव्दारे कळविल्या आहेत, अशी माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष साठे यांनी दिली.
निगडी प्राधिकरण येथे सचिन साठे यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेसच्या सर्व सेलच्या पदाधिका-यांची बैठक मंगळवारी (दि. 24) आयोजित करण्यात आली. यावेळी माजी महापौर कविचंद भाट, सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, महाराष्ट्र प्रदेश अनूसूचित जाती काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष गौतम आरकडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कमिटी अल्पसंख्याक सेल उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मयूर जैसवाल, असंघटीत कामगार काँग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे आदी उपस्थित होते.
पिंपरी, चिंचवड व भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघातील कोणतीही एक जागा काँग्रेस पक्षासाठी मिळावी यासाठी शहर काँग्रेसच्या वतीने वरिष्ठांकडे मागणी होत आहे. कॉंग्रेसच्या मतदारांच्या व जुन्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून अजित पवार यांनी आत्मचिंतन करावे. मागील महापालिका निवडणुकीत अशीच हटवादी भूमिका घेऊन काँग्रेस व राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे निवडणुका लढल्या. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र निवडणुका लढल्या असत्या तर, राष्ट्रवादीच्या 15 ते 18 जागा आणि काँग्रेसच्या 10 ते 12 जागा वाढल्या असत्या. महालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात आली नसती. शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मागणीचा अजित पवार व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गांभीर्याने विचार करावा, असेही सचिन साठे यांनी सांगितले.