अखंड श्रमदानचा कान्हेरीचा संकल्प
भवानीनगर- पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा 2018 या स्पर्धेत सहभागी झालेले कन्हेरी गाव श्रमदानात तालुक्यातील इतर गावांच्या तुलनेत मागे आहे. मात्र, पुढच्या वर्षी संपूर्ण ताकदीने या स्पर्धेत उतरणार असून आत्ता पासून अखंड श्रमदानाचा संकल्प गावाने सोडला असून त्या दृष्टीने पावले ही टाकले आहे, असे मत तालुका समन्वयक मयूर साळुंके व पृथ्वीराज लाड यांनी व्यक्त केले.
कन्हेरी येथील सबस्टेशन (विद्युत उपकेंद्र) च्या मागे गायरान गट नं 339 मध्ये शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार, फाउंडेशनची टीम, राष्ट्रवादीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ, पंचायत समिती सभापती संजय भोसले, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे, तहसीलदार हनुमंत पाटील, सरपंच आरती शेलार, उपसरपंच कमल शेलार, सदस्य सतीश काटे, दिपक शेलार, मिराबाई शेलार, ग्रामपंचायत कर्मचारी विनोद काळे, कोतवाल राम खोत, ग्रामविद्युत सेवक संदीप मासाळ व ग्रामस्थ यांनी श्रमदान केले. दरम्यान, ग्रामस्थांनी केलेल्या श्रमदानातून सुमारे 20 हजार लिटर पाणी साठवण क्षमतेचे काम झाले आहे, अशी माहिती ग्रामसेवक पूनम गायकवाड व तलाठी तेजस्वि मोरे यांनी दिली.