अकरावी प्रवेशाची यंदाही चढाओढ
मुंबई : सीबीएसई बोर्डाचा दहावीच्या निकालाचा टक्का घसरला असला तरी नव्वद टक्क्यांहून जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमालीची वाढली आहे. यामुळे अकरावी प्रवेशात यंदाही चुरस पाहवयास मिळणार आहे.
अकरावी व बारावीसाठी राज्य मंडळातील कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. यामुळे या मंडळाच्या परीक्षेत ९० किंवा ९५हून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली की राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांबरोबर अकरावी प्रवेशासाठी चढाओढ वाढते. यंदा देशभरातून एकूण एक लाख ३१ हजार ४९३ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांच्यावर तर २७ हजार ४७६ विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. मुंबईचा समावेश असलेल्या मंडळाच्या चेन्नई विभागात ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देशात सर्वाधिक २६ हजार ६७० इतकी आहे. तर ९५ टक्क्यांहून जास्त गुण मिळवणारे विद्यार्थीही याच विभागात सर्वाधिक पाच हजार ७३७ इतके आहेत.