अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान अपघात, एकाचा मृत्यू
अंबरनाथ – मध्य रेल्वे मार्गावरील अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकादरम्यान खडी टाकण्याचे काम करणारी मशीन रेल्वे रुळावरून घसरून अपघात झाला आहे. या अपघातात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींना कल्याण येथील रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या अपघातामुळे अंबरनाथ आणि कर्जतदरम्यानची वाहतूक विस्कळीत झाली असून त्याचा परिणाम मुंबईच्या लोकल वाहतुकीवर झाला आहे.
वाचा :-रत्नागिरी, नागपुरातील पाचवी ते आठवीच्या शाळांचा आज श्रीगणेशा
मिळालेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनाची सुट्टी आल्यामुळे रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. आज पहाटेच्या सुमारास अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान टी.आर.टी मशीनद्वारे रेल्वे रुळावर खडी दाबण्याचे काम सुरू होते. मात्र हे मशीन अचानक कोसळले. या अपघातात राजू जगाळे या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.
या अपघातानंतर बदलापूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल वाहतुकीवर परिणाम झाला असून सध्या रेल्वे प्रशासनाकडून या मशीनच्या इंजिन दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामाकरिता आणखी काही तास लागणार आहेत.