अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार नाहीच; राज्याच्या आपत्कालीन व्यवस्थापन बैठकीत निर्णय
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार सद्य:स्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे शक्य नाही, असे राज्य सरकारतर्फे सोमवारी स्पष्ट करण्यात आले. सर्व १३ अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनीही सद्य:स्थितीत परीक्षा घेणे उचित होणार नाही हे शासनाला लेखी कळवले आहे, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत संगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात आढावा घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सामंत यांनी हे जाहीर केले. परीक्षा घेऊच नये अशी शासनाची भूमिका नाही, तर राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आशा परिस्थितीत आता परीक्षा घेणे योग्य होणार नाही ही शासनाची भूमिका आहे. असे सामंत यांनी स्पष्ट केले.
परीक्षा न घेण्याची ही कारणे
1 अनेक शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे क्वॉरंटाइन सेंटर म्हणून उपयोगात येत आहेत.
2 वाहतुकीची व्यवस्था नसल्याने गावी गेलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात परत येणे अवघड आहे.
3 अनेक विद्यार्थ्यांची सर्व पुस्तके, संगणक साहित्य त्यांच्या वसतिगृहात अडकले आहेत.
4 नुकतेच बंगळुरूमध्ये ५० जणांची परीक्षा घेतली यात निम्म्या विद्यार्थ्यांना कोविडची बाधा झाली. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांची जबाबदारी कोण घेणार?